भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे. अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. महाराष्ट्राच्या घडणीला भौगोलिक वैशिष्टये कारणीभूत आहेत हे खरे; पण त्याबरोबरच संस्कृती आणि राजकीय जीवन या क्षेत्रांतील लक्षणीय वेगळेपणामुळे भारतीय संघराज्यात महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या भूगोल, इतिहास आणि संस्कृती मुख्यत: मराठी साहित्य- यांचे निरीक्षण केले तर महाराष्ट्राच्या अस्मितेची कारणे आणि तिची व्यवच्छेदक लक्षणे स्पष्ट दिसू लागतात.
|